पुन्हा एकदा

05 11 2008

तेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा
अंगावर ये तोच शहारा पुन्हा एकदा

( तेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा
गोड आठवे घडला होता गुन्हा एकदा

रोज तापसी दुपार होता अरे शापिता
सावलीत ये बैस जरासा उन्हा एकदा )
आठवांतले कुठे मिळावे तिचे गाव ते
कोण मांडतो जुना पसारा पुन्हा एकदा
जेमतेम तो करारनामा पुरा वाचला
तोच वाजला तोच नगारा पुन्हा एकदा
केस मोकळे नकोच सोडू सखे आज तू
वाट पाहतो उनाड वारा पुन्हा एकदा
पाहण्या तुझे नीलम-पाचू,मेघ दाटले
करी नर्तना,ढाळ पिसारा पुन्हा एकदा
नाव-गावही वाहुन गेल्यावरी आज हे
कोण शोधते तुझा किनारा पुन्हा एकदा

उत्तरार्ध

01 11 2008

( पूर्वसूत्र :  ‘पूर्वार्ध’ )

….आत्ता कुठे सुरु झाला होता,
त्यांच्यातल्या नात्याचा प्रवास, उत्तरार्धाकडे!
——————————

कंबर कसून ते नातं आता कामाला लागलं,
कधी हादरलेल्या त्याला
किंवा भेदरलेल्या तिला
दोघांना चुचकारत -प्रसंगी फटकारत,
खाचखळगे,नागमोडी वळणं धीरानं पार करत
दोन्ही चाकांना मार्गावर ठेवत…

पण लवकरच पुन्हा एकदा दोघांना भासू लागलं, की
स्वेच्छेने कडेवर घेतलेलं
ते नातं होतं मानेवरचं असह्य जोखड!

फारकतीच्या सुरांना बरकत येऊ लागली..
आणि खांद्यावरचं जू उतरवून
स्वतंत्र वाटा शोधण्यासाठी
सुरु झाल्या त्यांच्या सशस्त्र वाटाघाटी !

हतबल त्राग्यातून,दोषारोपांच्या फैरींतून
अटळ आत्ममंथन होऊ लागलं, तेव्हा सामोरं आलं
कल्पिताहून अद्भुत एक उघड गुपित-

दोघांतलं नातं असं काही वेगळं नसतंच,
असतो केवळ प्रत्येकाचा दोन रुपांतला एकत्र प्रवास, आत्मशोधाचा !

आपल्या भविष्याआड येऊ पहाणार्‍या नात्याला
दूर सारुन त्यांनी पाहिलं,तर दूरवर काहीच दिसेना..

आत्मबोधाच्या क्षणी कलह कसा संपला, आणि ते नातं
त्यांच्यात कधी विरघळून गेलं, त्यांना कळलंही नाही…

आपलं इथलं काम संपवून नातं निघालं,
पुन्हा एका नवीन प्रवासाला-
——————————-
…सार्‍या नजरा चुकवत
त्या दोघांची पहिली डोळाभेट झाली तेव्हा….

पूर्वार्ध

31 10 2008

सार्‍या नजरा चुकवत
त्या दोघांची पहिली डोळाभेट झाली
तेव्हा, त्यांच्याशिवाय एकांतात तिथे
त्यांच्याही नकळत आणखी कुणीतरी होतं,
हळूहळू आकार घेऊ पाहणारं,
दोन जिवांतलं नवजात नातं…..
त्यांना माहीत नव्हतं, पण-
त्यांच्यामधल्या अदॄश्य सेतूवर हुंदडत
त्यांच्याकडे निरागस अपेक्षेने बघत,
त्यांना अनावरपणे एकमेकांकडे ओढत….
प्रत्येक भेटीत, पुढच्या मीलनाची ओढ लावत,
ते क्षणागणिक बाळसं धरू लागलं होतं….
…..
यथावकाश ते वयात आलं, आणि दोघांनी
एक दिवस त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं,
तेव्हा ते नातं अमाप सुखावलं,
दोघांच्या गळ्यात पडून, क्षणभर विसावलं.
त्या दोघांना कवेत घेऊन, हवेत तरंगू लागलं
त्याचा दरवळ सुदूर पसरला..
तिच्या लाडक्या हिरव्या चाफ्यासारखा, स्वप्नवत्.
….
दरम्यान, अव्याहतपणे –
वास्तवातल्या दिवसांचे आठवडे होत होते, महिन्यांची वर्षं
ते नातं नुकतं कुठे स्थिरावत होतं, आणि एका गाफिल दिवशी..
शब्दांवर शब्द आदळून तो तिच्यावर रागावून ओरडला,
तेव्हा ते केवढ्यांदातरी दचकलं-
त्यांना एकटं सोडून कोपर्‍यात एकटं थरथरत उभं राहिलं..

अनुत्तरित प्रश्नांच्या, गैरसमज-मतभेदांच्या वावटळीत सापडलेली
ती दोघंही भिरभिरत राहिली, बराच काळ.

वादळानंतरच्या शांततेत दिलजमाईची एक गार झुळूक दबकत आली,
तेव्हा कुठे त्या नात्यावरचा ताण सैलावला
आणि मनाशी काही ठरवून ते निर्धाराने पुढे सरलं.
नवीन जबाबदारीची जाणीव होऊन ते आता
अकाली पोक्तपणाने, त्यांना हाकारु लागलं…
…..
आत्ता कुठे सुरू झाला होता,
त्यांच्यातल्या नात्याचा अधिकॄत प्रवास, उत्तरार्धाकडे !

पहिली दिवाळी

28 10 2008

दीपमालिका चहुकडोनी झगमगते दारात चांदणी
भल्या पहाटे सडा घालुनी रंगावलि काढून अंगणी

गर्भरेशमी वस्त्र लेउनी निरांजने ती घेउन हाती
कुंदकळ्यांची प्रभा पसरली खळी खुले आरक्त प्रभाती

कुंकुम भाळी मेंदी हाती, किती वागवी अहेवलेणी
कंकण हाती पायी जोडवी नथ नाकी अन् कुंडल कानी

कटाक्ष भोळे भिरभिर डोळे कष्टाने बहु आवरते ती
क्षणात हसते, बावरतेही पुन्हा धिराने सावरते ती

नाव घेउनी चूर लाजुनी भावसागरा येते भरती
स्वतः भोवती घेते गिरकी चुकार बट ती गालावरती

किणकिण हासत पैंजण वाजत अंगणात साजते नव्हाळी
दीप नाचती सलज्ज नयनी ही पहिली गाजते दिवाळी !

सुचले नाही

22 10 2008

{मायबोली.कॉम येथील गझल कार्यशाळेकरिता पाठवलेली ‘लगा लगागा लगागालगा ललगा गागा’ ह्या वॄत्तातली  ‘रचले नाही’ ही पहिली गझल अलामत आणि एकूणच तंत्र न जमल्यामुळे नव्याने लिहिली व सुधारित रचना ‘सुचले नाही’ तेथेच प्रथम प्रकाशित केली.}
********************************************************************************************************

रचले नाही
…………

उभे रहावे किनार्‍यावरी सुचले नाही
वहात जावे प्रवाहासवे,सुचले नाही

गुपीत होते विश्वासावर उघडे केले
जनांत सारे तुझे सांगणे रुचले नाही

जगात सारे कसे चालते बघता मीही
चुकून खोटे कधी वागलो-पचले नाही

तिचे बहाणे,तिचे वागणे हॄदया माझ्या
कळून चुकले, तरी बापडे खचले नाही

उगाच वाटे जरा बोलुनी हलके होऊ
उगाच की हे कुणी गावया रचले नाही
*******************************

सुचले नाही
…………

जमाव जातो कुठे, पाहुया- सुचले नाही
प्रवाहासवे पुढे जाउया-  सुचले नाही

मनाकडे मी कितीकदा कुजबुजलो होतो
तुलाच सारे कधी सांगुया- सुचले नाही

जगावे कसे सांगाया ते अधीर होते
कुणास येथे गुरु मानुया-सुचले नाही

नमस्कारही कराया मला जमले होते
चमत्कार मागून पाहुया-सुचले नाही

लवाद आणि निवाड्यात मी थकून गेलो
कधी पुरावे तरी मागुया -सुचले नाही

तिचे उखाणे, तिचे वागणे छळून गेले
नवाच कोणी हात शोधुया-सुचले नाही

मला कळेना कुणा बोलुनी हलका होऊ
सुरात हे रडगान गाउया- सुचले नाही

उदे उदे उदे उदे

06 10 2008

उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

नवरातीची चाहुल , घट मांडू पानं फुलं
ठेक्यात उठे पाउल, मन तालावरती डुलं
गोंधळास पातली, माझी रेणुकामाउली  ॥१॥

माहूरगडी बैसली, माझी मायेची सावली
रेणुकामाउली गं, रेणुकामाउली
उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

पोर नाचे आईपुढं, घालितो तिला साकडं
घाईत वेडवाकडं, तूच पाही माझ्याकडं
तुळ्जापुरवासिनी भवानी, आई जगदंबा ही ॥२॥

तुळ्जाई भवानी, माय तुळ्जाई भवानी
तुळजापुरवासिनी गं , तुळजापुरी भवानी
उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

वाजवी भक्त संबळ, काळजामधी खळबळ
वाहे डोळा पाणी गळं,भक्तिभावाचा दर्वळ
करविरातली अंबाबाई, महालक्षुमी आई ॥३॥

उदे गं अंबाबाई, माझी आई लक्षुंबाई
कोल्हापुरवासिनी गं,उदे गं अंबाबाई
उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

सांडिला पुरा अभिमान,हरपुनी गेलं देहभान
पायांत लागलं ध्यान,डोळ्यांत आणुनी प्राण
नाशिकातली वणी पाहिली ,सप्तशॄंगी आई ॥४॥

नाशिकात सप्तशॄंगी, माउली वणीची देवी
सप्तशॄंगवासिनी गं ,भक्ताची पर्वणी
उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

क्षण हा

02 10 2008

दारी उभी तू क्षण हा थांबलेला
नि:शब्द मीही,गळा दाटलेला
ह्या घडीला मूक राहूत दोघे
बोलू देऊत फक्त ह्या क्षणाला

अव्याहत रांगेत त्या क्षणांच्या
संशय,भयाच्या वादळी रणांच्या
गर्दीत तो उभा होता धिराने
साहून बेड्या पायी मणांच्या

प्रश्नकाहूर ते पळभरी असू दे
मुक्त आसवे ही गाली गळू दे
उतरवू दागिने वेदनेचे क्षणैक
सुख मीलनाचे क्षणाला मिळू दे

ओठांकिनारी अश्रूंत वहाते
स्मितनौका,हेलकावे पहा ते
असो दुरावे,डोळ्यांतच भेटू
म्हणेल क्षण ‘अहा,प्रेमी पहा ते!’

कालचेच होते

25 09 2008

माझ्या पराभवाचे ते दाखलेच होते
सोडून हात गेले ते आपलेच होते

झाल्या चुका तरी थोरांनीच माफ केले
डोळे वटारलेले- ते धाकलेच होते

नावाजले जगाने सांगू तरी कुणाला
की नाव आपल्यांनी तर टाकलेच होते

झाली पहाट,झाला बभ्रा कसा कळेना
की कोंबडेहि सारे मी झाकलेच होते

मागावयास माफी ते पाय मी धरोनी
गेलो,नि हाय दैवा ते माखलेच होते

दु:खास मीच माझ्या बाहूंत शांत केले
शोधीत आसरा ते मजसारखेच होते

हे काय आज त्यांना आले हसू नव्याने
माझे फजीत होणे तर कालचेच होते

आले गणराय

09 09 2008

येता गणेशाचा सण, जन जाती हरखुन
जुनंपानं विसरुन, नवं कौतुक लेऊन

घरा येता गणराय,काय सांगू थाटमाट
पाट रांगोळी आरास, पुढे मोदकांचे ताट

पुढे येतसे गौराई, ठाई ठाई रोषणाई
आई तीन दिवसांत,घरी निघुनिया जाई

येता अकरावा दिन, गणपति विसर्जन
बोळवण भावभरे, साठवण आठवण

गजानन मनी धरु, करु भजन आरती
किती आवरा मनास,येते डोळ्यांत भरती !

********************************************

आले आले गणराय, घरी अकरा दिवस
वर्षाकाठी एकदाच, अम्हां त्यांचा सहवास

आले वाजत गाजत, घरा आले गजानन
रुप साजिरं बघून, फिटे डोळ्याचं पारणं

आले आले गणराय, मागोमाग येई गौरी
तीन दिवस उत्सव ,थाट-माट घरोघरी

आले आले गणराय, करु भजन आरती
गोड नाम घेता घेता, कसे दिवस सरती

यथाकाल बोळवण,कधी येऊ नये वाटे
भक्त नाचे देवापुढे,पण डोळा पूर दाटे !

ख्वाब

07 09 2008

कई दिनोंसे ख्वाब ये देखा है मैंने
खुदहीको तुम बनते देखा है मैंने
इन आँखोंसे है देखा उन आँखोंमें
उस मुझको जो तुमने देखा है मुझमें…

इठलाती चितवन तबस्सुमके ताने
अदाओंके नश्तर ये मासूम बहाने
हवाएंभी अब यूं लगीं हैं सताने
लाईं है महक हमें फ़िर लुभाने

दिनभर ये तुम्हारे दीदारके वहम
रात ख्वाबोंमें फिर तुम और हम
कहनेको दो हैं पर हमारी कसम
बताओ जरा जुदा कब थे हम !

माना कि अबभी बहोत  फासलें हैं
किस्मतके देखेंगे क्या फैसलें हैं
उमंगोंके नित ये नयें घोंसलें हैं
पाएंगे तुमको बुलन्द हौसलें हैं