एखादी अनुभूती, सत्य वा कल्पित
करते भावनिर्मिति ,
अन भावना पुरेश्या बळावल्या
की न राहवून, चाळवते प्रतिभा.
मुक्या प्रतिमांची मग सुरु होते धावपळ;
त्यांच्या भोवती फेर धरुन प्रियाराधन करु लागतात
काही बोलघेवडे शब्द , अनुरुप अन चपळ.
शिस्तप्रिय रचनाशास्त्र त्यांना घालू पाहातं
वृत्त-अलंकारांचं बंधन,
रचनेचं सौष्ठव करायला लावतं
भावनांशी तडजोड, पण कधीकधी
होतं त्याचं एक सुरेखसं कोंदण….
तर कधी होतच रहातो मुक्तछंदी, बेगुमान
शब्द- प्रतिमांचा लपंडाव, रुढींना गुंगारा देऊन.
कविमन थबकून हा व्यापार पाहू लागतं-
हा हा म्हणता साकारु लागतो एक आकृतिबंध,
त्यानं पुरेसं बाळसं धरलं, की
येऊ लागतो अभिव्यक्तीचा अभिनिवेश
आणि यथावकाश, घटिका भरली की
संपन्न होतो काव्यप्रवेश !
प्रतिक्रिया व्यक्त करा